TOD Marathi

मुख्यमंत्र्यांच्या ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन अनेक वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल (There should not be Special Protocol to Chief Minister Convoy, says CM Ekanath Shinde) नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. वाहतूक कोंडीने त्रासलेल्या सर्वसामान्य वाहनचालकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखली जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे.

या व्यवस्थेमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे.